धाराशिव (यशश्री अपडेट्स):
भूम नगर परिषदेत मुख्याधिकारी आणि नगरसेवकांमधील वाद आता विकोपाला गेला असून, थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. भूम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांनी नगर परिषदेतील तब्बल ८ नगरसेवकांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत, पोलीस संरक्षणाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा राग मनात धरून मुख्याधिकाऱ्यांनी हा कट रचल्याचा पलटवार संबंधित नगरसेवकांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे भूम शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय? (मुख्याधिकाऱ्यांचे गंभीर आरोप)
मुख्याधिकारी शैला डाके यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, नगर परिषदेतील ८ नगरसेवक सतत शासकीय कामात अडथळा आणत आहेत. कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव आणणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे आणि धमक्या देणे असा प्रकार दररोज सुरू आहे.
तक्रारीत नाव असलेले ८ नगरसेवक:
- रुपेश शेंडगे
- अनिल शेंडगे
- चंद्रमणी गायकवाड
- आबासाहेब मस्कर
- रामराजे कुंभार
- नवनाथ रोकडे
- विठ्ठल बागडे
- श्री. पवार
मुख्याधिकाऱ्यांच्या आरोपानुसार, हे सर्व नगरसेवक कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहून आरडाओरडा करतात. “कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कामकाज कसे करतात ते बघून घेऊ,” अशा धमक्या दिल्या जातात. या वातावरणामुळे कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे अत्यंत भीतीदायक झाले असून, स्वतःच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे डाके यांनी अर्जात म्हटले आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत तात्काळ पोलीस संरक्षण मिळावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निर्देश
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना आवश्यक ते पोलीस संरक्षण पुरवण्यासंदर्भात तात्काळ योग्य ते आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत.
नगरसेवकांचा पलटवार: “भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याचा राग”
या प्रकरणी मुख्याधिकारी शैला डाके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र, ज्या नगरसेवकांवर हे आरोप झाले आहेत, त्यांनी या सर्व प्रकारावर कडाडून उत्तर दिले आहे.
नगरसेवकांचा दावा आहे की, मुख्याधिकारी शैला डाके यांच्या भ्रष्टाचाराच्या आणि नियमबाह्य कारभाराच्या अनेक तक्रारी त्यांनी वरिष्ठ पातळीवर केल्या आहेत. या तक्रारींमुळे अडचणीत आलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून आणि भ्रष्टाचाराची पोलखोल झाल्याच्या रागातूनच हा बनाव रचला आहे.
आगामी काळात वाद अधिक चिघळण्याची शक्यता
एकीकडे महिला मुख्याधिकाऱ्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत पोलीस संरक्षण मागितले आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या सर्व राजकीय आणि प्रशासकीय नाट्यामुळे भूम नगर परिषदेचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून, येणाऱ्या दिवसांत हा वाद अधिक पेटण्याची आणि कायदेशीर व राजकीय स्तरावर मोठे वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
