धाराशिवमध्ये महायुतीत ‘बॅनर वॉर’? ‘आपला जीव धाराशिव’ उपक्रमाच्या होर्डिंगवरून तानाजी सावंत, ओमराजे निंबाळकर गायब; राजकीय वर्तुळात खळबळ!

यशश्री अपडेट्स | विशेष प्रतिनिधी, धाराशिव: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केल्यानंतर धाराशिवमध्ये महायुती अधिक भक्कम होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, प्रत्यक्षात महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी नाट्य संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आपला जीव धाराशिव’ या उपक्रमाच्या निमित्ताने महायुतीतील हे मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्हा दौऱ्यानिमित्त शहरभरात शासकीय आणि अधिकृत बॅनर लावण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जवरून खासदार ओमराजे निंबाळकर तसेच माजी मंत्री व आमदार प्रा. तानाजी सावंत यांचे फोटो चक्क गायब करण्यात आले आहेत. बॅनरवर केवळ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचाच फोटो झळकल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ज्यांच्या पाठिंब्यावर सत्ता, त्यांनाच डावलले?

धाराशिव जिल्हा परिषदेत सध्या महायुतीची सत्ता असून अर्चना पाटील या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. तानाजी सावंत यांच्या समर्थक १२ सदस्यांसह शिवसेनेच्या एकूण २० सदस्यांच्या ठोस पाठिंब्यावर ही सत्ता टिकून आहे. मात्र, ज्या सावंतांच्या बळावर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन झाली, त्यांनाच अशा महत्त्वाच्या उपक्रमापासून आणि अधिकृत बॅनरवरून दूर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोबतच, महायुतीत नव्याने आलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही यात स्थान न दिल्याने भाजपच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष; कार्यक्रमावर बहिष्काराची शक्यता

आपल्या प्रमुख नेत्यांची अशा प्रकारे जाहीर अवहेलना झाल्याने तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. भाजप आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

या राजकीय घडामोडींमुळे संतप्त झालेल्या सावंतांच्या व निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांनी ‘आपला जीव धाराशिव’ या शासकीय कार्यक्रमावर थेट बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. यामुळे ऐन कार्यक्रमाच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत दरी अधिक रुंदावली असून, आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!