मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण

यशश्री अपडेट्स | अंतरवाली सराटी (प्रतिनिधी)

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या अद्याप पूर्णपणे मान्य झालेल्या नसल्याने मुंबईला जाण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले आहेत. अंतरवाली सराटी येथे शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाचे मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि पुढील नियोजनाची माहिती दिली.

जरांगे पाटील यांच्या नियोजनानुसार १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान विविध ठिकाणी मुक्काम करण्यात येणार असून, १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

असा असेल मुंबईकडे जाण्याचा मार्ग

१५ सप्टेंबर : पाटोदा
मुंबईच्या दिशेने कूच केल्यानंतर पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे करण्यात येणार आहे.

१६ सप्टेंबर : श्रीगोंदा
यानंतर १६ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे दुसरा मुक्काम असेल.

१७ सप्टेंबर : हडपसर, पुणे
१७ सप्टेंबर रोजी पुण्यातील हडपसर येथे तिसरा मुक्काम करण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

१८ सप्टेंबर : खोपोली
मुंबईच्या दिशेने पुढे जात १८ सप्टेंबर रोजी खोपोली येथे चौथा मुक्काम असेल.

१९ सप्टेंबर : आझाद मैदान, मुंबई
१९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय असल्याचे जरांगे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.

मुंबईला न येणाऱ्या मराठा बांधवांनाही आवाहन

मुंबईला प्रत्येकाला येणे शक्य नसेल, अशा मराठा बांधवांनीही आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. मुंबईला न येणाऱ्या बांधवांनी आंदोलनाच्या मार्गावर उभे राहून आशीर्वाद द्यावा आणि त्यानंतर आपल्या गावाकडे परतावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच ज्या मार्गावरून मराठा बांधव मुंबईकडे जाणार आहेत, त्या मार्गावर त्यांच्या जेवण, पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘एक दिवस जातीसाठी द्या’

मराठा बांधवांनी आंदोलनासाठी एक दिवस देण्याचे आवाहन करताना त्या दिवशी काम, नोकरी आणि व्यवसाय बंद ठेवून आंदोलनाला साथ द्यावी, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

चारचाकी वाहने असलेल्या मराठा बांधवांनी आंदोलकांना मुंबईपर्यंत सोडण्यासाठी मदत करावी आणि त्यानंतर परत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आंदोलनाच्या नियोजनाकडे राज्याचे लक्ष

अंतरवाली सराटी येथील बैठकीनंतर मुंबई आंदोलनाचे नियोजन स्पष्ट झाल्याने आता राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रवासादरम्यान विविध ठिकाणी मराठा बांधवांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही या आंदोलनाच्या नियोजनाचे आव्हान असणार आहे.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारकडून पुढील काळात कोणती भूमिका घेतली जाते आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!