यशश्री अपडेट्स-धाराशिव(प्रतिनिधी)
धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद लातूर बीड या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चर्चा चालू असतानाच शिवसेनेच्या गटनेत्याने अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद- लातूर- बीड या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असून कळंब नगरपालिकेचे गटनेते संजय मुंदडा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हा उमेदवारी अर्ज दाखल केल्या आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणत्या पक्षाला द्यायची याची चर्चा सुरू असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या जवळच्या उद्धव ठाकरे गटाच्या गटनेत्याने फॉर्म भरल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.
महाविकास आघाडीकडे पूर्ण संख्याबळ असून मीच महाविकास आघाडीचा उमेदवार असून विजयी होणार असल्याचा दावा फॉर्म भरणारे उमेदवार संजय मुंदडा यांनी केला आहे. तसेच या मतदारसंघाचे आमदार म्हणून ज्यांनी प्रतिनिधित्व केले त्या सुरेश धस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचे कुठलेच प्रश्न सोडवले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
