कार्यालयांत फेऱ्या मारणे बंद करा, शिबिरासारखा स्पीड रोज दाखवा! आमदार कैलास पाटील-घाडगे यांचा प्रशासनाला थेट इशारा; शिराढोणच्या ‘महसूल समाधान शिबिरात’ ३,५४५ लाभार्थ्यांना दिलासा!

नागरिकांची अडवणूक थांबवा, कामे वेळेतच झाली पाहिजेत!

धाराशिव / शिराढोण : शासकीय कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणे आता खपवून घेतले जाणार नाही! शिबिरात दाखवला जाणारा कामाचा स्पीड आणि तत्परता रोजच्या शासकीय कारभारातही दिसलीच पाहिजे, असा कडक इशारा कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील-घाडगे यांनी प्रशासनाला दिला आहे.

शिराढोण येथील ओमसाई मंगल कार्यालयात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात’ ते बोलत होते. या शिबिरात एकाच दिवसात ३,५४५ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देऊन प्रशासनाने धडाका दाखवला.

‘शिबिरापुरता देखावा नको, कार्यालयांतही तोच धडाका हवा!’

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आक्रमक पवित्र्यात आमदार कैलास पाटील म्हणाले:

“नागरिकांना छोट्या-छोट्या दाखल्यांसाठी आणि कामांसाठी वारंवार चकरा मारायला लावणे थांबले पाहिजे. महसूल शिबिरामध्ये ज्या वेगाने कामे होतात, तीच तत्परता शासकीय कार्यालयांमध्ये कायमस्वरूपी दिसली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी आदर्श समोर ठेवून अधिकाऱ्यांनी सकारात्मक मानसिकतेने काम करावे. अतिक्रमणे नियमानुसार नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असून एकाही नागरिकाची गैरसोय होता कामा नये!”

एकाच छताखाली योजनांचा पाऊस!

ग्रामीण भागातील जनतेला भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाने या शिबिरात कंबर कसली होती:

  • एकाच ठिकाणी सर्व सुविधा: जात, उत्पन्न, रहिवासी दाखले, महसुली प्रकरणे, कृषी, आरोग्य आणि सामाजिक न्याय विभागाचे स्टॉल उभारून तातडीने अर्ज स्वीकारून निकाल लावण्यात आले.
  • आरोग्य जनजागृती: आमदार पाटील यांनी विशेषतः महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले.
  • प्रशासकीय कटिबद्धता: “ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी महसूल प्रशासन पूर्ण ताकदीने बांधील आहे,” अशी ग्वाही अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

प्रशासकीय फौजफाटा हजर!

या धडक उपक्रमाला शिराढोणसह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमास जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती श्री. कोकणे, कळंब पंचायत समिती सभापती राजश्री वरपे, धाराशिव पंचायत समिती सभापती गोकर्णा कदम, उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, धाराशिवचे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, कळंबच्या अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील, सरपंच लक्ष्मीबाई म्हेत्रे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!